‘ कोकणातील विद्यार्थी कोकणातच रोजगार मिळवून तेथेच स्थायिक कसा होईल ,यासाठी महाविद्यालयांनी क्रियाशील होणे आवश्यक ‘,- माननीय कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर यांचे प्रतिपादन
कोकणामधील विद्यार्थ्यांमध्ये अनेक कलागुण लपलेले असून त्यासाठी विद्यार्थ्यांच्या कौशल्यांवर भर देत त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. तसेच कोकणातील विद्यार्थ्यांचे शहरी भागात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी महाविद्यालयांनी एकत्रित रित्या क्रियाशील होऊन स्थानिक विद्यार्थ्यांना डिग्री मिळविल्यानंतर लगेचच रोजगार प्राप्तीची क्षमता मिळेल या दृष्टीने ठोस पावले उचलायला हवीत, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये आयोजित विद्यार्थी संवाद या कार्यक्रमामध्ये प्रतिपादित केले.
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या सभागृहात दिनांक २६ एप्रिल २०२२ रोजी मुंबई विद्यापीठा द्वारे विद्यार्थी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच विविध महाविद्यालयांतील प्राचार्यांना आपल्यासमोर येणारी आव्हाने व समस्या प्रत्यक्ष मुंबई विद्यापीठाच्या अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या समोर मोकळेपणाने मांडता आल्या.
सदर कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रांत करण्यात आले होते. प्रथम सत्रामध्ये कार्यक्रमास उपस्थित उत्तर रत्नागिरी विभागातील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यरत प्राचार्य व संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांचे होणारे स्थलांतर, विद्यार्थ्यांच्या प्रवासाची होणारी गैरसोय, विद्यार्थी संख्या, ऑनलाइन शिक्षणातील अडथळे, अभिनव उपक्रमांबाबतच्या विविध संकल्पना याविषयी कुलगुरूंची सखोल संवाद साधला.
या सत्राच्या अंतिम भागात कुलगुरूंनी उपस्थित प्राचार्यांचा असे आवाहन केले की,’ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुसार शैक्षणिक अध्ययन पद्धती अधिक प्रयोगशील आणि ऑनलाईन स्त्रोतांचा, तंत्रज्ञानाचा वापर करता येणारी हवी, जेणेकरून विद्यार्थी डिग्री प्राप्त केल्यानंतर रोजगार मिळविण्यास सक्षम होईल. ‘
कोकणात दडलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अध्ययना सोबतच व्यवसाय निर्मितीसाठी उपयोग करता येईल आणि भविष्यकाळात देशभरातील इतर विद्यार्थी अध्ययनासाठी कोकणातच येतील हे सुद्धा सदर चर्चासत्रातून प्रकर्षाने जाणवले.
द्वितीय सत्रामध्ये उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी अभ्यासक्रम अधिकतम प्रयोगावर आधारित असावा आणि प्रचलित घडामोडींचे साधर्म्य ठेवणारा हवा, अशी विनंती कुलगुरूंना केली. तसेच विविध स्पर्धा परीक्षांबाबत उत्तम मार्गदर्शन करणारे केंद्र व नियोजित अभ्यासक्रम ग्रामीण भागात सुरू करावा, हे देखील आवर्जून सांगितले.
अंततः मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांस संबोधित करीत ‘ध्येयवादी होऊन शिक्षणातून रोजगार प्राप्त करत राष्ट्र विकासासाठी विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान द्यावे ‘ असे आवाहनही केले.
सदर कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ.अजय भामरे, रजिस्टार श्री. सुधीर पुराणिक, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ.सुनील पाटील हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष मराठे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे उपप्राचार्य डॉ.घन:श्याम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहेनत घेतली.